पृष्ठे

अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्तः फणी
तं च क्रौञ्चपतेः शिखी च गिरिजासिंहोSपि नागाननम् |
गौरी जह्नुसुतामसूयति कलानाथं कपालोनलो
निर्विण्णः स पपौ कुटुम्बकलहाद् ईशोsपि हालाहलम् ||

- भुकेने व्याकुळ झालेल्या (शंकराच्या गळ्यातील) नागाला गणपतीचे वाहन म्हणजे उंदीर खाण्याची इच्छा आहे. तर कार्तिकेयाचे वाहन मोर त्या नागाला खाऊ इच्छितो. पार्वतीचे वाहन सिंह कार्तिकेयाच्या मोराला खाऊ इच्छितो. पार्वती शंकराच्या जटेतील गंगेचा द्वेष करते तर त्याच्या कपाळावरचा अग्नी मस्तकावरील चंद्राला पाण्यात बघतो. अशाप्रकारे घरगुती भांडणांना वैतागलेल्या शंकराने - साक्षात देवाने देखील विष प्यायले.

शंकराने हलाहल प्यायले ह्या पौराणिक कथेचा संबंध त्याच्या घरातील भांडणाशी जोडला आहे. देवांना माणसाच्या भावभावना जोडून विनोदनिर्मिती केल्याची अशी बरीच उदाहरणे संस्कृत साहित्यात सापडतात.
'कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो?'  'हंसः' , 'कुतो?' 'मानसात्'
'किं तत्रास्ति ?' 'सुवर्णपङ्कजवनान्यम्भः सुधासन्निभम् |
मुक्ताशुक्तिरथास्ति रत्ननिचयः वैदूर्यरोहाः क्वचित् '
'शम्बूकाः किमु सन्ति ?' 'न' इति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ||

- हंसाला बगळे विचारतात - "तांबडे डोळे व तांबडे पाय असलेल्या पक्ष्या, तू कोण आहेस?" "हंस", "कोठून आलास?" "मानससरोवरातून" , "तिकडे काय आहे?" बगळ्यांने कुतुहलाने विचारले. "तिकडे सोन्याची कमळे असलेली वने आहेत, अमृतासारखे पाणी आहे, मोत्यांचे शिंपले आहेत, रत्नांचे खच आहेत, वैडूर्याचे कोंब देखील आहेत " . यावर ते विचारतात "तिकडे कवड्या आहेत काय" आणि हंसाने "नाही" असे उत्तर दिल्यावर सर्व बगळे खी खी करून हसत सुटले.

ह्या अन्योक्तीचा अर्थ अनेक प्रकारे लावता येईल. जसे की - प्रत्येकाची आवड आणि प्राधान्य वेगळे. किंवा आपल्याच जगात असणाऱ्यांना इतरत्र असलेल्या वैभवाची पारख नसते. तुम्हाला अजून काही सुचतोय?
यज्जीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यैर्विज्ञानशौर्यविभवार्यगुणैः समेतम् |
तन्नाम जीवितमिति प्रवदन्ति तज्ज्ञाः काकोऽपि जीवति चिरं च बलिं च भुङ्क्ते ||
 
- एक क्षणभर जरी जगलो तरी ते जगणे ज्ञान , शौर्य आणि वैभव ह्या गुणांनी युक्त असावे यासाठी माणसाने प्रयत्नशील असावे. विद्वानांच्या मते तेच खरे जगणे होय. नाहीतर पिंडाला दिलेला घास खाऊन कावळे देखील पुष्कळ जगतात.
कार्यापेक्षी जनः प्रायः प्रीतिमाविष्करोत्यलम् |
लोभार्थी शौण्डिकः शष्पैर्मेषं पुष्णाति पेशलैः ||

- एखादा लोभी खाटीक बकरा विकण्यापूर्वी त्याला कोवळे गवत खायला घालून उत्तम प्रकारे पोसतो. त्याप्रमाणेच एखाद्याला जेव्हा आपले काम करून घ्यायची इच्छा असते तेव्हा तो ज्याच्याकडून काम होण्याची शक्यता आहे त्याच्याशी अत्यंत गोड आणि प्रेमाने वागतो.
ददतो युद्धमानस्य पठतः पुलको न चेत् | 
आत्मनश्च परेषां च धिक् त्यागं पौरुषं श्रुतम् ||

- दान देताना , शत्रूशी लढताना आणि एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना जर करणाऱ्याला आनंद मिळत नसेल तर अशा त्यागाचा, पौरुषाचा(शौर्याचा) आणि अभ्यासाचा काहीच उपयोग नाही. मग त्या गोष्टी न केलेल्याच उत्तम.
शास्त्राण्यधीत्यापि भवन्ति मूर्खाः
यस्तु क्रियावान् पुरुषः स विद्वान् |
संचिन्तितं त्वौषधमातुरं हि
किं नाममात्रेण करोत्यरोगम् ||

- अनेक शास्त्रांचे अध्ययन करून देखील माणसे मूर्खच रहातात. जो प्रत्यक्ष कृती करतो तो खरा विद्वान होय. आजारी पडल्यावर औषधाचा कितीही विचार केला तरी नुसते औषधाच्या नावाने रोग बरा होत नाही. (जोपर्यंत औषध प्रत्यक्ष घेत नाही तोवर रोग बरा होत नाही)
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यावज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |
उत्पद्यते हि मम कोSपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

- भवभूती (मालतीमाधव)

- जे कोणी आमच्याबद्दल वेडीवाकडी मते पसरवीत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे की हे काव्य किंवा लिखाणाचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. कधीतरी माझे काव्य समजणारा कोणी समानधर्मी जन्माला येईलच. हा काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे.