पृष्ठे

लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन्
पिबेच्च मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः |
कदाचिदपि पर्यटञ्छशविषाणमासादयेत्
नतु प्रतिनिविष्टमूर्खजन चित्तमाराधयेत् ||

- प्रयत्नपूर्वक जर वाळू रगडली तर त्यातून कदाचित तेलही मिळेल, तहानेने व्याकूळ झालेला आपली तहान मृगजळाच्या पाण्याने देखील भागवू शकेल, वणवण भटकणार्याला एखाद्या वेळेस सशाचे शिंगही सापडेल. (अशा सर्व अशक्य वाटणार्या गोष्टीही कदाचित साध्य होतील) पण मूर्ख आणि हेकेखोर माणसाची समजूत कधीही घालता येणार नाही.
कुसुमस्तबकस्येव द्वयी वृत्तिर्मनस्विन:।
मूर्ध्नि वा सर्वलोकस्य विशीर्येत वनेऽथवा॥

- महान लोकांची अवस्था फुलांच्या गुच्छाप्रमाणेच दोन प्रकारची असू शकते. एकतर ती सर्व जगाच्या डोक्यावर दिमाखाने रहातात किंवा एकटीच वनात झुरून मरून जातात (नाश पावतात).
ह्यापेक्षा इतर कोणत्याही अवस्थेत रहाण्यासाठी आवश्यक असणारी तडजोड ते करत नाहीत.
इतरतापशतानि यदृच्छया
वितर तानि सहे चतुरानन |
अरसिकेषु कवित्वनिवेदनं
शिरसि मा लिख मा लिख मा लिख ||

- हे ब्रह्मदेवा , तुला हवे ते इतर शंभर ताप माझ्या वाट्याला दे . मी ते सहन करेन. पण अरसिक माणसाला कविता सांगण्याचा ताप मात्र माझ्या कपाळी कदापि लिहू नकोस! लिहू नकोस !! लिहू नकोस!!!
जिह्वे प्रमाणं जानीहि भाषणे भोजनेऽपि च |
अत्युक्तिरतिभुक्तिश्च सद्य: प्राणापहारिणी ||

- हे जिव्हे (जिभे) , खाताना आणि बोलताना आपल्या मर्यादा ओळख. अति बोलणे आणि अति खाणे ह्या दोन्ही गोष्टी जीव घेणाऱ्या आहेत.
आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ
लक्ष्मी: स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||

- संपत्तीमुळे आंधळ्या झालेल्या हे मूर्ख माणसा, संकटात सापडलेल्या माणसाला का हसत आहेस? लक्ष्मी (पैसा) एका ठिकाणी स्थिर रहात नाही यात विचित्र ते काय ? विहिरीवर ह्या रहाटाला लावलेला घडा बघ, रिकामा झालेला परत भरतो आणि भरलेला परत रिकामा होतो.
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्त:।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक्ताञ्च तं च मदनं च इमां च मां च ||

-मी जिचा सतत विचार करतो ती माझ्याबाबतीत विरक्त आहे, तिला दुसराच कोणी आवडतो आणि त्याला अजून वेगळीच कोणीतरी आवडते. अजून तिसरीच कोणीतरी माझी अभिलाषा धरून आहे .तिचा ,त्याचा ,मदनाचा ,त्या स्त्रीचा आणि माझाही धिक्कार असो.
रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्बोधा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

- हे चातक पक्ष्या, सावध होऊन एक क्षणभर ऐक. आकाशात खूप सारे ढग आहेत ,पण सर्वच एकसारखे नाहीत. त्यापैकी काहीच ढग पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करणारे आहेत तर काही विनाकारण गर्जना करणारे पण पाऊस न पाडणारे आहेत. म्हणून जो जो ढग दिसेल त्याच्याकडे पाण्याची याचना करत फिरू नकोस.
हे अन्योक्ती प्रकारातले सुभाषित आहे. या प्रकारात मानव सोडून इतर कोणालातरी (जसे चातक, मोर ,बगळा इत्यादी) व्यवहारातील उपदेश असतो पण तो माणसालाही वेगळ्या संदर्भात लागू पडतो. जसे वरील सुभाषितातून, माणसाने आपल्याला खरंच मदत करणारे कोण आणि नुसत्याच वल्गना करणारे कोण हे नीट ओळखून त्याप्रमाणे वागावे असा अर्थ लावता येतो.