पृष्ठे

पैसा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पैसा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यज्जीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यैर्विज्ञानशौर्यविभवार्यगुणैः समेतम् |
तन्नाम जीवितमिति प्रवदन्ति तज्ज्ञाः काकोऽपि जीवति चिरं च बलिं च भुङ्क्ते ||
 
- एक क्षणभर जरी जगलो तरी ते जगणे ज्ञान , शौर्य आणि वैभव ह्या गुणांनी युक्त असावे यासाठी माणसाने प्रयत्नशील असावे. विद्वानांच्या मते तेच खरे जगणे होय. नाहीतर पिंडाला दिलेला घास खाऊन कावळे देखील पुष्कळ जगतात.
प्राप्ताः श्रियः सकलकामदुधाः ततः किं न्यस्तं पदं शिरसि विद्विषतां ततः किम् |
सम्पादिताः प्रणयिनो विभवैः ततः किं कल्पस्थितास्तनुभृतां तनवः ततः किम् ||

(वैराग्यशतक -  भर्तृहरि)

- सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे वैभव मिळविले तर मग पुढे काय? शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवला (शत्रूंचा निःपात केला )तर मग पुढे काय? आपल्या संपत्तीच्या जोरावर मित्र मिळविले तर मग पुढे काय? माणसांची शरीरे कल्पांतापर्यंत राहिली (माणसे अमर झाली) तर मग पुढे काय?

माणसाच्या इच्छा कधीही न संपणाऱ्या असतात.
पिपीलिकार्जितं धान्यं मक्षिकासञ्चितं मधु ।
लुब्धेन सञ्चितं द्रव्यं समूलं हि विनश्यति ।।

 - मुंग्यांनी साठवून ठेवलेले धान्य, मधमाशांनी साठविलेला मध आणि लोभी माणसाने साठविलेले द्रव्य यांचा संपूर्ण नाश होतोच.
जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः |
स क्रमः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च ||

- पाण्याचा थेंब थेंब जमा होऊन घागर पूर्ण भरते. तशाच प्रकारे सर्व विद्या, धर्म (पुण्य) आणि धन देखील थोडे थोडे जमा होत त्याचा मोठा साठा होतो.
अर्थानामर्जने दुःखमर्जितानां च रक्षणे |
आये दुःखं व्यये दुःखं धिगर्थाः कष्टसंश्रयाः ||

- पैसा मिळवताना त्रास असतो. मिळालेला पैसा जतन करताना त्रास होतो. पैसा आला तरी दुःख खर्च झाला तरी दुःख. अशाप्रकारे कायम त्रासाला कारणीभूत ठरणाऱ्या पैशाचा धिक्कार असो.


विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम् |
पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम् ||

-  विद्या असली की अंगी विनय येतो. विनयामुळे पात्रता (लायकी) येते. ती आली की धन मिळते . धनामुळे धर्मानुसार (आयुष्य जगण्याची पद्धत, पार पडायची कर्तव्ये या अर्थाने) जगता येते आणि त्यामुळे सुख मिळते.

दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ।।

- दान करणे , उपभोग घेणे आणि नाश होणे असे तीन मार्ग पैसा जाण्याचे आहेत. जो आपला पैसा दान करीत नाही किंवा त्याचा उपभोग घेत नाही त्याचा पैसा कायम तिसऱ्या मार्गाने जातो. (नष्ट होतो)
दानं प्रियवाक्सहितं ज्ञानमगर्वं क्षमान्वितं शौर्यम् |
वित्तं त्यागसमेतं दुर्लभमेतच्चतुर्विधं भद्रम् ||

- चांगले शब्द बोलून दिलेले दान (प्रिय असे बोलणारा दानी माणूस ), गर्वरहित ज्ञान ( नम्र विद्वान) , क्षमेने परिपूर्ण असे शौर्य (क्षमाशील शूर माणूस) आणि त्यागाची जोड असलेले धन ( त्याग करू शकणारा श्रीमंत) ह्या चार कल्याणकारी आणि तितक्याच दुर्मिळ गोष्टी आहेत. 
नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम्
नष्टा विद्या लभ्यतेsभ्यासयुक्ता |
नष्टारोग्यं सूपचारैः सुसाध्यम्
नष्टा वेला या गता सा गतैव ||

- गेलेले धन कष्ट करून परत मिळविता येते. गेलेली विद्या (अज्ञान) अभ्यास करून प्राप्त करता येते.  नष्ट झालेले आरोग्य चांगल्या उपचारांनी परत मिळते पण एकदा जी वेळ गेली ती गेलीच.
पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भाया पुनर्मही |
एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः ||

- गेलेला पैसा, गेलेले मित्र, गेलेली बायको किंवा जमीन (जागा) हे सर्व परत मिळू शकते. पण एकदा गेलेले शरीर मात्र परत मिळत नाही.
आपद्गतं हससि किं द्रविणान्धमूढ
लक्ष्मी: स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् |
एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे
रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ||

- संपत्तीमुळे आंधळ्या झालेल्या हे मूर्ख माणसा, संकटात सापडलेल्या माणसाला का हसत आहेस? लक्ष्मी (पैसा) एका ठिकाणी स्थिर रहात नाही यात विचित्र ते काय ? विहिरीवर ह्या रहाटाला लावलेला घडा बघ, रिकामा झालेला परत भरतो आणि भरलेला परत रिकामा होतो.
अर्थातुराणां न गुरुर्न बन्धुः कामातुराणां न भयं न लज्जा।
विद्यातुराणां न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला ||

- पैशाच्या मागे लागलेला माणूस गुरू काय किंवा भाऊ काय काहीही जाणत नाही, कामविव्हल माणसाला ना कशाची भीती असते ना लाज, विद्येच्या मागे असलेल्या माणसाला कधीही सुख (समाधान) आणि झोप नसते , भुकेलेल्याला वेळेची किंवा अन्नाच्या चवीची पर्वा नसते.