पृष्ठे

अन्योक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अन्योक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
'कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो?'  'हंसः' , 'कुतो?' 'मानसात्'
'किं तत्रास्ति ?' 'सुवर्णपङ्कजवनान्यम्भः सुधासन्निभम् |
मुक्ताशुक्तिरथास्ति रत्ननिचयः वैदूर्यरोहाः क्वचित् '
'शम्बूकाः किमु सन्ति ?' 'न' इति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ||

- हंसाला बगळे विचारतात - "तांबडे डोळे व तांबडे पाय असलेल्या पक्ष्या, तू कोण आहेस?" "हंस", "कोठून आलास?" "मानससरोवरातून" , "तिकडे काय आहे?" बगळ्यांने कुतुहलाने विचारले. "तिकडे सोन्याची कमळे असलेली वने आहेत, अमृतासारखे पाणी आहे, मोत्यांचे शिंपले आहेत, रत्नांचे खच आहेत, वैडूर्याचे कोंब देखील आहेत " . यावर ते विचारतात "तिकडे कवड्या आहेत काय" आणि हंसाने "नाही" असे उत्तर दिल्यावर सर्व बगळे खी खी करून हसत सुटले.

ह्या अन्योक्तीचा अर्थ अनेक प्रकारे लावता येईल. जसे की - प्रत्येकाची आवड आणि प्राधान्य वेगळे. किंवा आपल्याच जगात असणाऱ्यांना इतरत्र असलेल्या वैभवाची पारख नसते. तुम्हाला अजून काही सुचतोय?
वासः काञ्चनपञ्जरे नृपकराम्भोजैर्तनूमार्जनं
भक्ष्यं स्वादुरसालदाडिमफलं पेयं सुधाभं पयः |
पाठ्यं संसदि रामनाम सततं धीरस्य कीरस्य मे
हा हा हन्त ! तथापि जन्मविटपिक्रोडं मनो धावति ||

(शुकान्योक्ति)

-पोपट म्हणतो - अत्यंत बुद्धिमान अशा मला येथे राजाकडे सोन्याच्या पिंजऱ्यात रहायला मिळत आहे. राजा स्वतःच्या कमळासारख्या हाताने माझे शरीर स्वच्छ करतो . मला येथे अत्यंत स्वादिष्ट आणि रसाळ असे डाळिंब खायला मिळते आणि अमृतासारखे पेय प्यायला मिळते. राजसभेत मी सतत रामाचे नाव पठण करीत असतो . (अशी सर्व सुखे असूनही) पण अरेरे! तरीही माझे मन मात्र माझा जन्म जिथे झाला त्या झाडाच्या ढोलीकडेच धाव घेत आहे. 
हंसः श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः ।
 नीरक्षीरविवेके तु बकः बकः हंसः हंसः ||

- हंस पांढरा असतो आणि बगळा देखील पांढराच असतो. मग या दोघांमध्ये फरक काय? दूध आणि पाणी वेगळे करायची वेळ आल्यास मात्र हंस कोण आणि बगळा कोण हे ओळखू येते. (नीरक्षीरविवेक - म्हणजे दूध आणि पाणी एकमेकांपासून वेगळे करण्याचे कौशल्य हंसाकडे असते अशी समजूत आहे)
काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककाकयोः ।
वसन्तसमये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः ||

- कावळा काळा असतो आणि कोकिळ देखील काळाच असतो. मग दोघांमध्ये फरक तो काय ? वसंत ऋतू आल्यानंतर मात्र कावळा हा कावळा आणि कोकिळ हा कोकिळ आहे हे ओळखू येते. 
अग्निदाहे न मे दुःखं छेदने निकषे न वा |
एतदेव महद्दुःखं गुञ्जया सह तोलनम् ||

- सोने म्हणते - मला आगीमध्ये तापविल्याने, तोडल्याने किंवा कस ठरविण्याने (त्यासाठी दगडावर घासल्याने)दुःख होत नाही.पण मला गुंजेसारख्या निकृष्ट प्रतीच्या पदार्थाबरोबर तोलले जाते याचे मात्र अतिशय दुःख होते.

ही सुवर्णान्योक्ती आहे . सोन्याला इतर कोणत्याही त्रासाचे दुःख वाटत नाही पण अपमानाचे वाटते.तसेच थोर माणसे कोणतेही दुःख सहन करतील पण त्यांना अपमानाचे दुःख असह्य होते.
वसन्ति कानने वृक्षाः फलपुष्पैश्च भूषिताः |
आम्रं विना परं चित्तं कोकिलस्य न तुष्यति ||

- वसंतॠतूमध्ये अरण्यातील वृक्ष फळाफुलांनी बहरून गेलेले असतात .पण कोकिळेचे मन मात्र आंब्याशिवाय संतुष्ट होत नाही.
ह्याला अन्योक्ती प्रकारचे सुभाषित म्हणता येईल. आजूबाजूला कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी काही लोकांचे मन एकाच विशिष्ट गोष्टीत गुंतून पडलेले असते आणि तिच्याशिवाय त्यांना खरा आनंद होत नाही.
जिह्वे प्रमाणं जानीहि भाषणे भोजनेऽपि च |
अत्युक्तिरतिभुक्तिश्च सद्य: प्राणापहारिणी ||

- हे जिव्हे (जिभे) , खाताना आणि बोलताना आपल्या मर्यादा ओळख. अति बोलणे आणि अति खाणे ह्या दोन्ही गोष्टी जीव घेणाऱ्या आहेत.
रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्बोधा बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

- हे चातक पक्ष्या, सावध होऊन एक क्षणभर ऐक. आकाशात खूप सारे ढग आहेत ,पण सर्वच एकसारखे नाहीत. त्यापैकी काहीच ढग पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करणारे आहेत तर काही विनाकारण गर्जना करणारे पण पाऊस न पाडणारे आहेत. म्हणून जो जो ढग दिसेल त्याच्याकडे पाण्याची याचना करत फिरू नकोस.
हे अन्योक्ती प्रकारातले सुभाषित आहे. या प्रकारात मानव सोडून इतर कोणालातरी (जसे चातक, मोर ,बगळा इत्यादी) व्यवहारातील उपदेश असतो पण तो माणसालाही वेगळ्या संदर्भात लागू पडतो. जसे वरील सुभाषितातून, माणसाने आपल्याला खरंच मदत करणारे कोण आणि नुसत्याच वल्गना करणारे कोण हे नीट ओळखून त्याप्रमाणे वागावे असा अर्थ लावता येतो.
अखिलेषु विहङ्गेषु हन्त स्वच्छन्दचारिषु |
शुक, पञ्जरबन्धन्ते मधुराणां गिरां फलम् ||

- अरे पोपटा, सर्व पक्ष्यांमधे मोकळेपणाने इकडे तिकडे फिरणार्या तुझ्या वाट्याला जो बंदीवास आला आहे, तो तुझ्या मधुर बोलण्यामुळेच
माणसामधे इतरांना आनंद देणारा गुण असला की लोक त्याचा विचार न करता फायदा घेऊ बघतात.
विधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:|
सहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन||

- हे कावळ्या,आंब्याच्या झाडावर एका गोड आवाजाच्या कोकीळ पक्ष्याबरोबर राहूनही तू वाईट आवाजातच ओरडतोस यात तुझा काहीच अपराध नाही...ह्यात दोष नियतीचा आहे.(कारण कावळ्याचा आवाज मुळातच चांगला नसतो) म्हणजेच जी गोष्ट तुमच्याजवळ मुळातच नाही,ती गोष्ट फक्त ज्यांच्या जवळ ती आहे त्यांच्या बरोबर राहून मिळवता येत नाही.