पृष्ठे

योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोस्मि ||
आबाहु पुरुषाकारं शङ्खचक्रासि धारणं सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम् ।।

- योगाच्या सहाय्याने मनातला, व्याकरणाने वाणीतला आणि वैद्यकशास्त्राने शरीरातला मळ ज्यांनी दूर केला अशा त्या श्रेष्ठ पतंजली मुनींना मी हात जोडून प्रणाम करतो.
ज्यांच्या शरीराचा वरील भाग पुरुषाचा आहे आणि ज्यांनी शंख व चक्र धारण केले आहे अशा हजार तेजस्वी मुखे असलेल्या पतंजली ऋषींना मी प्रणाम करतो.

गुणायन्ते दोषाः सुजनवदने दुर्जनमुखे |
गुणा दोषायन्ते तदिदमपि नो विस्मयपदम् ||
महामेघः क्षारं पिबति कुरुते वारि मधुरम्
फणी पीत्वा दुग्धं वमति गरलं दुःसहतरम् ||

- सज्जन माणसाच्या मुखी दोष देखील गुण बनतात तर दुर्जन माणसाच्या मुखी गुण दोषाच्या रुपात प्रकट होतात ह्यात आश्चर्य काहीच नाही. ढग खारट पाणी पितात आणि मधुर असा पाऊस पाडतात तर साप मात्र दूध पिऊनदेखील अतिशय दुःसह असे विषच ओकतो.

जीवन्तु मे शत्रुगणाः सदैव
येषां प्रसादत्सुविचक्षणोSहम् |
ये ये यथा मां प्रतिबाधयन्ति
ते ते तथा मां प्रतिबोधयन्ति ||

- ज्यांच्या कृपेने मी एवढा हुशार झालो आहे असे माझे सर्व शत्रू कायम जगोत (कारण) जसे जसे ते मला अडथळा आणतात तसे तसे ते मला अजूनच शहाणे करतात. 
ज्ञानं प्रधानं न तु कर्महीनं कर्म प्रधानं न तु बुद्धिहीनम् |
तस्माद् द्वयोरेव भवेत्सुसिद्धिर्न ह्येकपक्षो विहगः प्रयाति ||

- कोणतेही काम न करता नुसतेच ज्ञान असेल तर ते महत्त्वाचे ठरत नाही. तसेच कोणत्याही ज्ञानाशिवाय एखादे काम केले तर ते बिनमहत्त्वाचे असते. म्हणून ज्ञान आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टी यश (साध्य) मिळविण्यासाठी महत्त्वाच्या असतात. नुसत्याच एका पंखाच्या बळावर पक्षी उडू शकत नाही.
यथा खरश्चन्दनभारवाही भारस्य वेत्ता न तु चन्दनस्य |
एवं हि शास्त्राणि बहून्यधीत्य अर्थेषु मूढा: खरवद् वहन्ति ||

- ज्याप्रमाणे चंदनाचे नुसते ओझे वाहून काही गाढव चंदनाचे होत नाही त्याप्रमाणेच एखाद्याने कितीही शास्त्रांचे  अध्ययन केले तरी त्याचा अर्थ माहीत नसेल तर त्याची अवस्था गाढवाप्रमाणेच (ओझे वहाणाऱ्याची) होते.
केयूरा न विभूषयन्ति पुरुषं, हारा न चंद्रोज्वलाः
न स्नानं, न विलेपनं, न कुसुमं, नालङ्कृता मूर्धजा: |
वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ||

- माणसाला केयूरामुळे (दंडावरील अलंकार) शोभा येत नाही किंवा चंद्राप्रमाणे तेजस्वी हाराने देखील नाही. स्नान केल्याने, सुगंधी द्रव्याने मालिश केल्याने, फुलांमुळे किंवा केस सुशोभीत केल्याने सुद्धा नाही.सुसंस्कृत वाचा (बोलणे) माणसाला अलंकृत करते. इतर सर्व अलंकार हळू हळू नष्ट होत जातात पण उत्तम वाचा हे खरे भूषण आहे (कारण ते कायम बरोबर रहाते).
शरदि न वर्षति, गर्जति, वर्षति वर्षासु निःस्वनो मेघः |
नीचो वदति, न कुरुते, वदति न सुजनः, करोत्येव ||

- शरद ॠतू मधील ढग नुसतेच गरजतात पण बरसत नाहीत.याउलट वर्षाॠतूतील ढग अजिबात आवाज करीत नाहीत आणि पाऊस पाडतात.(तसेच) नीच लोक नुसतेच बोलतात करत काहीच नाहीत.सज्जन लोक मात्र न बोलता कृती करतात.(गरजेल तो पडेल काय)