पृष्ठे

शास्त्राण्यधीत्यापि भवन्ति मूर्खाः
यस्तु क्रियावान् पुरुषः स विद्वान् |
संचिन्तितं त्वौषधमातुरं हि
किं नाममात्रेण करोत्यरोगम् ||

- अनेक शास्त्रांचे अध्ययन करून देखील माणसे मूर्खच रहातात. जो प्रत्यक्ष कृती करतो तो खरा विद्वान होय. आजारी पडल्यावर औषधाचा कितीही विचार केला तरी नुसते औषधाच्या नावाने रोग बरा होत नाही. (जोपर्यंत औषध प्रत्यक्ष घेत नाही तोवर रोग बरा होत नाही)
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यावज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |
उत्पद्यते हि मम कोSपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

- भवभूती (मालतीमाधव)

- जे कोणी आमच्याबद्दल वेडीवाकडी मते पसरवीत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे की हे काव्य किंवा लिखाणाचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. कधीतरी माझे काव्य समजणारा कोणी समानधर्मी जन्माला येईलच. हा काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे.
आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||

- जेव्हा जे परत द्यायला पाहिजे तेव्हा ते द्यावे , जेव्हा जे करायला पाहिजे तेव्हा ते करावे. जे करायचे आहे ते लगेचच वेळेवर न केल्यास त्यातील सर्व रस काळ पिऊन टाकतो (नष्ट करतो)
भ्रातः काञ्चनलेपगोपितबहिः ताम्राकृते सर्वतः
मा भैषीः कलश , स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि |
ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा तेSधुना 
नान्तस्तत्त्वविचारणप्रणयिनः लोकाः बहिर्बुद्धयः ||

- अरे कळसा, बंधो, तू मूळचा तांब्याचा असून तुला केवळ बाहेरून सोन्याचा मुलामा दिला आहे म्हणून चिंता करू नकोस. देवळावर शांतपणे कायमचा रहा. तुझे तांब्याचे असणे मागे पडले असून आता तू सोन्याचाच आहेस अशी कीर्ती सर्वत्र पसरली आहे . आतले सत्त्व जाणून घेण्यात लोकांना फारसा रस नसतो. बाहेरून जे काही दिसेल त्यानुसारच ते आपले मत बनवितात .
प्राप्ताः श्रियः सकलकामदुधाः ततः किं न्यस्तं पदं शिरसि विद्विषतां ततः किम् |
सम्पादिताः प्रणयिनो विभवैः ततः किं कल्पस्थितास्तनुभृतां तनवः ततः किम् ||

(वैराग्यशतक -  भर्तृहरि)

- सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे वैभव मिळविले तर मग पुढे काय? शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवला (शत्रूंचा निःपात केला )तर मग पुढे काय? आपल्या संपत्तीच्या जोरावर मित्र मिळविले तर मग पुढे काय? माणसांची शरीरे कल्पांतापर्यंत राहिली (माणसे अमर झाली) तर मग पुढे काय?

माणसाच्या इच्छा कधीही न संपणाऱ्या असतात.
नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके
जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन्द्रैः |
इति महति विरोधे वर्तमाने समाने
नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता ||

- राजाचे हित पहाणारा जो असतो त्याचा सामान्य लोक द्वेष करतात. लोकांचे हित पाहणारा राजाकडून दूर सारला जातो. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी सारखाच विरोध होत असताना राजा आणि प्रजा यांचे सारखेच हित पाहाणारा कार्यकर्ता दुर्लभ असतो.
अनेकशास्त्रं बहु वेदितव्यमल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः |
यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ||

- शिकायला पुष्कळ शास्त्रे आहेत , खूप काही जाणण्यासारखे आहे पण काळ थोडा आहे आणि अडचणी भरपूर. म्हणून ज्याप्रमाणे हंस पाण्यापासून दूध वेगळे करून घेतो त्याप्रमाणे माणसाने जे काही सार असेल (उत्तम असेल) त्याची निष्ठेने उपासना करावी .