पृष्ठे

अत्तुं वाञ्छति वाहनं गणपतेराखुं क्षुधार्तः फणी
तं च क्रौञ्चपतेः शिखी च गिरिजासिंहोSपि नागाननम् |
गौरी जह्नुसुतामसूयति कलानाथं कपालोनलो
निर्विण्णः स पपौ कुटुम्बकलहाद् ईशोsपि हालाहलम् ||

- भुकेने व्याकुळ झालेल्या (शंकराच्या गळ्यातील) नागाला गणपतीचे वाहन म्हणजे उंदीर खाण्याची इच्छा आहे. तर कार्तिकेयाचे वाहन मोर त्या नागाला खाऊ इच्छितो. पार्वतीचे वाहन सिंह कार्तिकेयाच्या मोराला खाऊ इच्छितो. पार्वती शंकराच्या जटेतील गंगेचा द्वेष करते तर त्याच्या कपाळावरचा अग्नी मस्तकावरील चंद्राला पाण्यात बघतो. अशाप्रकारे घरगुती भांडणांना वैतागलेल्या शंकराने - साक्षात देवाने देखील विष प्यायले.

शंकराने हलाहल प्यायले ह्या पौराणिक कथेचा संबंध त्याच्या घरातील भांडणाशी जोडला आहे. देवांना माणसाच्या भावभावना जोडून विनोदनिर्मिती केल्याची अशी बरीच उदाहरणे संस्कृत साहित्यात सापडतात.
'कस्त्वं लोहितलोचनास्यचरणो?'  'हंसः' , 'कुतो?' 'मानसात्'
'किं तत्रास्ति ?' 'सुवर्णपङ्कजवनान्यम्भः सुधासन्निभम् |
मुक्ताशुक्तिरथास्ति रत्ननिचयः वैदूर्यरोहाः क्वचित् '
'शम्बूकाः किमु सन्ति ?' 'न' इति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ||

- हंसाला बगळे विचारतात - "तांबडे डोळे व तांबडे पाय असलेल्या पक्ष्या, तू कोण आहेस?" "हंस", "कोठून आलास?" "मानससरोवरातून" , "तिकडे काय आहे?" बगळ्यांने कुतुहलाने विचारले. "तिकडे सोन्याची कमळे असलेली वने आहेत, अमृतासारखे पाणी आहे, मोत्यांचे शिंपले आहेत, रत्नांचे खच आहेत, वैडूर्याचे कोंब देखील आहेत " . यावर ते विचारतात "तिकडे कवड्या आहेत काय" आणि हंसाने "नाही" असे उत्तर दिल्यावर सर्व बगळे खी खी करून हसत सुटले.

ह्या अन्योक्तीचा अर्थ अनेक प्रकारे लावता येईल. जसे की - प्रत्येकाची आवड आणि प्राधान्य वेगळे. किंवा आपल्याच जगात असणाऱ्यांना इतरत्र असलेल्या वैभवाची पारख नसते. तुम्हाला अजून काही सुचतोय?
यज्जीव्यते क्षणमपि प्रथितं मनुष्यैर्विज्ञानशौर्यविभवार्यगुणैः समेतम् |
तन्नाम जीवितमिति प्रवदन्ति तज्ज्ञाः काकोऽपि जीवति चिरं च बलिं च भुङ्क्ते ||
 
- एक क्षणभर जरी जगलो तरी ते जगणे ज्ञान , शौर्य आणि वैभव ह्या गुणांनी युक्त असावे यासाठी माणसाने प्रयत्नशील असावे. विद्वानांच्या मते तेच खरे जगणे होय. नाहीतर पिंडाला दिलेला घास खाऊन कावळे देखील पुष्कळ जगतात.
कार्यापेक्षी जनः प्रायः प्रीतिमाविष्करोत्यलम् |
लोभार्थी शौण्डिकः शष्पैर्मेषं पुष्णाति पेशलैः ||

- एखादा लोभी खाटीक बकरा विकण्यापूर्वी त्याला कोवळे गवत खायला घालून उत्तम प्रकारे पोसतो. त्याप्रमाणेच एखाद्याला जेव्हा आपले काम करून घ्यायची इच्छा असते तेव्हा तो ज्याच्याकडून काम होण्याची शक्यता आहे त्याच्याशी अत्यंत गोड आणि प्रेमाने वागतो.
ददतो युद्धमानस्य पठतः पुलको न चेत् | 
आत्मनश्च परेषां च धिक् त्यागं पौरुषं श्रुतम् ||

- दान देताना , शत्रूशी लढताना आणि एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना जर करणाऱ्याला आनंद मिळत नसेल तर अशा त्यागाचा, पौरुषाचा(शौर्याचा) आणि अभ्यासाचा काहीच उपयोग नाही. मग त्या गोष्टी न केलेल्याच उत्तम.
शास्त्राण्यधीत्यापि भवन्ति मूर्खाः
यस्तु क्रियावान् पुरुषः स विद्वान् |
संचिन्तितं त्वौषधमातुरं हि
किं नाममात्रेण करोत्यरोगम् ||

- अनेक शास्त्रांचे अध्ययन करून देखील माणसे मूर्खच रहातात. जो प्रत्यक्ष कृती करतो तो खरा विद्वान होय. आजारी पडल्यावर औषधाचा कितीही विचार केला तरी नुसते औषधाच्या नावाने रोग बरा होत नाही. (जोपर्यंत औषध प्रत्यक्ष घेत नाही तोवर रोग बरा होत नाही)
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यावज्ञां
जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः |
उत्पद्यते हि मम कोSपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ||

- भवभूती (मालतीमाधव)

- जे कोणी आमच्याबद्दल वेडीवाकडी मते पसरवीत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यावे की हे काव्य किंवा लिखाणाचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाही. कधीतरी माझे काव्य समजणारा कोणी समानधर्मी जन्माला येईलच. हा काळ अनंत आहे आणि पृथ्वी विशाल आहे.
आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||

- जेव्हा जे परत द्यायला पाहिजे तेव्हा ते द्यावे , जेव्हा जे करायला पाहिजे तेव्हा ते करावे. जे करायचे आहे ते लगेचच वेळेवर न केल्यास त्यातील सर्व रस काळ पिऊन टाकतो (नष्ट करतो)
भ्रातः काञ्चनलेपगोपितबहिः ताम्राकृते सर्वतः
मा भैषीः कलश , स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि |
ताम्रत्वं गतमेव काञ्चनमयी कीर्तिः स्थिरा तेSधुना 
नान्तस्तत्त्वविचारणप्रणयिनः लोकाः बहिर्बुद्धयः ||

- अरे कळसा, बंधो, तू मूळचा तांब्याचा असून तुला केवळ बाहेरून सोन्याचा मुलामा दिला आहे म्हणून चिंता करू नकोस. देवळावर शांतपणे कायमचा रहा. तुझे तांब्याचे असणे मागे पडले असून आता तू सोन्याचाच आहेस अशी कीर्ती सर्वत्र पसरली आहे . आतले सत्त्व जाणून घेण्यात लोकांना फारसा रस नसतो. बाहेरून जे काही दिसेल त्यानुसारच ते आपले मत बनवितात .
प्राप्ताः श्रियः सकलकामदुधाः ततः किं न्यस्तं पदं शिरसि विद्विषतां ततः किम् |
सम्पादिताः प्रणयिनो विभवैः ततः किं कल्पस्थितास्तनुभृतां तनवः ततः किम् ||

(वैराग्यशतक -  भर्तृहरि)

- सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे वैभव मिळविले तर मग पुढे काय? शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवला (शत्रूंचा निःपात केला )तर मग पुढे काय? आपल्या संपत्तीच्या जोरावर मित्र मिळविले तर मग पुढे काय? माणसांची शरीरे कल्पांतापर्यंत राहिली (माणसे अमर झाली) तर मग पुढे काय?

माणसाच्या इच्छा कधीही न संपणाऱ्या असतात.
नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके
जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन्द्रैः |
इति महति विरोधे वर्तमाने समाने
नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता ||

- राजाचे हित पहाणारा जो असतो त्याचा सामान्य लोक द्वेष करतात. लोकांचे हित पाहणारा राजाकडून दूर सारला जातो. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी सारखाच विरोध होत असताना राजा आणि प्रजा यांचे सारखेच हित पाहाणारा कार्यकर्ता दुर्लभ असतो.
अनेकशास्त्रं बहु वेदितव्यमल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः |
यत्सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात् ||

- शिकायला पुष्कळ शास्त्रे आहेत , खूप काही जाणण्यासारखे आहे पण काळ थोडा आहे आणि अडचणी भरपूर. म्हणून ज्याप्रमाणे हंस पाण्यापासून दूध वेगळे करून घेतो त्याप्रमाणे माणसाने जे काही सार असेल (उत्तम असेल) त्याची निष्ठेने उपासना करावी .
अफलानि दुरन्तानि समव्ययफलानि च |
अशक्यानि च वस्तूनि नारभेत् विचक्षणः ||

- निष्फळ होणारी, न संपणारी, केलेला खर्च आणि मिळालेले फळ सारखेच असणारी तसेच अशक्य असणारी कामे शहाण्या माणसाने हाती घेऊ नयेत.
निर्वाणदीपे किमु तैलदानं चौरे गते वा किमु सावधानम् ।
वयोगते किं वनिताविलासः पयोगते किं खलु सेतुबन्धः ।।

-  दिवा विझल्यानंतर त्यात तेल घालून काय उपयोग? चोर येऊन चोरी करून गेल्यानंतर सावधगिरी बाळगून काय उपयोग ? वय निघून गेल्यावर सुंदर स्त्रियांचा सहवास काय कामाचा? आणि पूर आल्यानंतर बांध घालून काय उपयोग?
प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ असते. ती निघून गेल्यावर काही करून उपयोग नसतो. 
परिश्रमो मिताहारो भूगतौ अश्विनिसुतौ |
तावनादृत्य नैवाहं वैद्यमन्यं समाश्रये ||

-  भरपूर शारीरिक कष्ट आणि मोजका आहार हे ह्या पृथ्वीवरील दोन अश्विनीकुमार (वैद्य) आहेत. त्यांचा अनादर करून मी इतर कोणत्याच वैद्याचा आश्रय घेत नाही. 
परोपदेशवेलायां शिष्टाः सर्वे भवन्ति वै |
विस्मरन्ति तु शिष्टत्वं स्वकार्ये समुपस्थिते ||

- दुसऱ्यांना उपदेश करायची वेळ आली म्हणजे सगळेच शहाणे असतात. पण स्वतःचे काही काम असेल तर मात्र हे शहाणपण विसरतात.
क्वचिद् वीणावाद्यं, क्वचिदपि च 'हा हा ' इति रुदितं
क्वचिद् रामा रम्या, क्वचिदपि जराजर्जरतनुः |
क्वचिद् विद्वद्गोष्ठी , क्वचिदपि सुरामत्तकलहः
न जाने संसारः किममृतमयः किं विषमयः ||

-  कधी वीणेचे मधुर वादन तर कधी मोठमोठ्याने रडणे, कधी सुंदर स्त्रीमध्ये रमणे तर कधी म्हातारपणाने विकलांग झालेले शरीर, कधी विद्वान लोकांबरोबर चर्चा तर कधी दारूच्या नशेत केलेली भांडणे ,असे सर्व असताना हे जग अमृतासारखे आहे का विषासारखे - कोण जाणे? 
सुखस्य दुःखस्य न कोSपि दाता परो ददातीति कुबुद्धिरेषा |
'अहं करोमि' इति वृथाSभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः ||

-  सुख काय किंवा दुःख काय ते देणारा असा दुसरा कोणीतरी आहे असे म्हणणे चुकीचेच आहे. 'मी करतो /माझ्यामुळे होते' असा खोटा अभिमान आणि स्वतःच्याच कर्मामुळे हे जग दुःखी होते.
वासः काञ्चनपञ्जरे नृपकराम्भोजैर्तनूमार्जनं
भक्ष्यं स्वादुरसालदाडिमफलं पेयं सुधाभं पयः |
पाठ्यं संसदि रामनाम सततं धीरस्य कीरस्य मे
हा हा हन्त ! तथापि जन्मविटपिक्रोडं मनो धावति ||

(शुकान्योक्ति)

-पोपट म्हणतो - अत्यंत बुद्धिमान अशा मला येथे राजाकडे सोन्याच्या पिंजऱ्यात रहायला मिळत आहे. राजा स्वतःच्या कमळासारख्या हाताने माझे शरीर स्वच्छ करतो . मला येथे अत्यंत स्वादिष्ट आणि रसाळ असे डाळिंब खायला मिळते आणि अमृतासारखे पेय प्यायला मिळते. राजसभेत मी सतत रामाचे नाव पठण करीत असतो . (अशी सर्व सुखे असूनही) पण अरेरे! तरीही माझे मन मात्र माझा जन्म जिथे झाला त्या झाडाच्या ढोलीकडेच धाव घेत आहे. 
हस्ती स्थूलतनुः चाङ्कुशवशः किं हस्तिमात्रोSङ्कुशः ?
वज्रेणाभिहताः पतन्ति गिरयः किं शैलमात्रः पविः ?
 प्रज्ज्वलिते विनश्यति तमः किं दीपमात्रं तमः ?
तेजो यस्य विराजते स बलवान् स्थुलेषु कः प्रत्ययः ?

- हत्ती शरीराने मोठा असला तरीही एक लहानसा अंकुश वापरून वठणीवर येऊ शकतो पण कधी हत्ती अंकुशावर नियंत्रण ठेवू शकतो काय? वज्राने आघात केला असता मोठे पर्वत कोसळून पडतात पण पर्वत त्या शस्त्राचे काही वाकडे करू शकतो काय? दिवा लावला असता अंधार नष्ट होतो पण अंधारामुळे दिव्याचा नाश होतो काय? म्हणजेच ज्याच्याकडे तेज आहे तो बलवान ठरतो . नुसताच आकाराने मोठा असणाऱ्याच्या अधीन कोणी असत नाही .